SHRIMANT

Monday, December 22, 2025

जो आत्महत्या करण्याचा विचार करतो त्यांनी हा लेख नक्की वाचावा

तुकोबारायांना अवघं चाळीस-एक्के
चाळीस वर्षांचं आयुष्य लाभलं आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप खूप दुःखांचा सामना करावा लागला . सांसारिक आयुष्य एक्केचाळीस वर्षांचं लाभलं तरी खऱ्या अर्थाने ज्याला सामाजिक आयुष्य म्हणतात ते फक्त एकोणीस-वीस वर्षांचंच होतं. या अल्प आयुष्यात तुकोबारायांनी हजारो अभंग रचले, सांसारिक सुखदुःखं अनुभवली, आणि सामाजिक सुखदुःखांवरही भाष्य केलं. समाजाच्या हाडामसात रुजलेल्या जुनाट रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, देवाधर्माच्या नावावर माजवण्यात आलेलं कर्मकांड आणि होत असलेलं शोषण, जन्माधिष्ठीत उच्चनीचता, स्त्रीया आणि शूद्रातीशूद्रांची गुलामगिरी याविरोधात त्यांनी संघर्ष केला.तसं तुकोबारायांचं घराणं चांगलं तालेवार घराणं होतं. त्यांच्या घरात पिढीजात सावकारी होती. शेती होती. बागायत होती. किराणा दुकान होतं. व्यापार होता.थोरला भाऊ सावजी आध्यात्मिक वृत्तीचा होता. त्याच्या पत्नीचं निधन झालं. पत्नीच्या निधनानंतर सावजी एक दिवस कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेला. त्याने संन्यास घेतला असं सांगितलं जातं. सुनेचा मृत्यू आणि मुलाचं घर सोडून जाणं यामुळे बोल्होबा, तुकोबारायांचे वडील, खचले. त्यामुळे संसाराचा भार आला फक्त बारा वर्षांच्या तुकोबारायांवर ! तो त्यांनी यशस्वीपणे पेललाही. तुकोबारायांचं लग्न झालं. त्यांना एक मुलगाही झाला. पण पत्नी सतत आजारीच असायची. म्हणून बोल्होबांनी तुकोबारायांचं दुसरं लग्न पुण्याच्या गुळवे सावकाराच्या मुलीशी करुन दिलं. जरा बरे दिवस आले तोच पुन्हा महाभयंकर दुष्काळ पडला. सतत तीन वर्षांच्या दुष्काळाने सामान्य लोकांची स्थिती त्राही माम्, त्राही माम् अशी झाली. अन्न नाही, पाणी नाही. लोकांनी झाडाचा पाला पोटात भरला. कित्येक लोक अन्न अन्न करत मेले. कित्येकांनी पोटचे गोळे बाजारात विकले. पशूपक्षी किती मेले त्याची तर गणतीच नाही. तुकोबारायांच्या पहिल्या पत्नीचा आणि मुलाचा याच दरम्यान मृत्यू झाला. पाठोपाठ वडिल गेले. आईही गेली. *संकटं येतात तेंव्हा एकटी येत नाही* असं म्हणतात. सुखाचे काही क्षण मिळत नाही तोच दु:खाचे पहाड अंगावर कोसळावेत असं आयुष्य सुरु होतं. म्हणून तुकोबाराय एका म्हणतात,"सुख पाहता जवापाडे । दु:ख पर्वता एवढे ।।" ही तुकोबारायांची आत्मानुभूती होती. आपण आपल्यावर थोडं दुःख झालं की डळमळीत होऊन जातो थोडाही धीर धरत नाही यावर तुकोबाराय म्हणतात *आला होता गेला पूर l धीर धरिला जीवनी ll* माझ्या आयुष्यात पुराएवढी खूप दुःख आणि संकट आली , पण त्यावेळी त्यांना मी धीराने तोंड दिलं म्हणून जशी दुःख आली तशी निघूनही गेली. कठीण काळात माणसांनी शांत राहायचं आणि असतं जे जे होईल त्याला धीराने सामोर जायचं असतं. काळाचे चक्र थांबत नसतं. फक्त थोडा संयम ठेवावा लागतो, बदल होतो.कितीही बिकट किंवा प्रतिकूल परिस्थिती किंवा नैराश्यपूर्ण वातावरण असलं तरीही हिंमत न हरता, धीर धरुन, विचारपूर्वक पावलं टाकली तर यश निश्चित असतं आणि तसंच आलेल्या परिस्थितीतून बाहेरही पडता येतं.तथागत भगवान गोतम बुद्धांनी सांगितलं आहे, "जग अनिच्च आहे." सर्वच अनिच्च म्हणजे अनित्य असेल तर सुखही राहणार नाही तसंच दु:खही राहणार नाही. संकटाचा काळही कायम राहणार नाही. काळ बदलणारच आहे. प्रतिकूल काळही जाणारच आहे. कितीही अंधारी रात्र असली तरी तिचा अंत होणारच आहे. उद्याचा सूर्य उगवणारच आहे. त्याला कोणीही अडवू शकणार नाही. धीर सोडला नाही तर काही ना काही मार्ग नक्कीच निघेल. यावर विश्वास ठेवून जो जगतो तो जिंकतो आणि आपल्या आजूबाजूला ही अशी आपल्याला दिसतात सुद्धा.छत्रपती शिवरायांच्या जीवनात सुद्धा अतिशय कठीण आणि दुःखाचे प्रसंग आले होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनात अनेक प्रसंगी केवळ शौर्य आणि धैर्य या बळावर विजय प्राप्त केला आहे. म्हणून संकट प्रसंगी माणसाने धीर सोडू नये. एका अभंगात तुकोबाराय म्हणतात “धीर तो कारण l साह्य होतो नारायण ।l” जो धीर धरतो त्याला देव मदत करतो. जो घाबरून पळून जातो त्याला नाही. म्हणून आपल्यावर आलेल्या परिस्थितीला सक्षमपणे , धीराने आणि संयमाने तोंड द्यावे. - जय जगद्गुरु तुकोबाराय - धर्मापुत्र

No comments: